रसधारा...

काव्यपंक्ती । सुविचार । इतर ...

करविली तैसी केली कटकट ।
वांकुडे कां नीट, देव जाणे ॥
- तुकाराम

Mar 1, 2007

पाण्याचा थेंब...

केसात पाण्याचा थेंब असा चमकत आहे
जसा बंदीत पडलेला एक एकाकी काजवा!

काय बिघडले छत जरा गळू लागले तर?

गुलजार - त्रिवेणी (पृ. क्र. ६)
-----

हे वाचून एकच प्रार्थना आहे देवा कडे. संकटे, कठीण प्रसंग यायचे तेव्हा येतीलच. पण ही अशी मस्त धुंद सौदर्यदृष्टी कायम जागृत ठेव म्हणजे पावलास!

आठवण...

अशी आली तुझी आठवण अचानक
जशी झाडांच्या गर्दीतून निघावी पाऊलवाट

उभा आहे मी घनदाट भूतकाळाच्या जंगलात

गुलजार - त्रिवेणी (पृ. क्र. ४९)
---

क्या बात आहे गुलजार साहेब!

Feb 27, 2007

...जें जें हवं तें तें आपणच व्हायचं...

पु. शि. रेगे यांच्या सावित्री या पुस्तकात सांगितलेली प्रतिकात्मक गोष्ट इथे देत आहे -

"...एक म्हातारी आणि तिची छोटी नात - लच्छी - गांवाबाहेर दूर रानापाशीं राहत होतीं. एकदां म्हातारीच्या झोपडीपाशीं एक मोर आला. मोराला पाहून लच्छी नाचूं लागली. मोरही नाचूं लागला. लच्छीने हट्ट घेतला कीं मोराला अंगणांतच बांधून ठेवावं. म्हातारी म्हणाली, तें कसं होणार? आपल्यापाशीं त्याला खायला द्यायला दाणागोटा कुठं आहे? दोघींचा निर्णय होईना. तेव्हां मोरच म्हणाला, मी इथंच जवळपास राहीन. मला दाणागोटा कांही नको. रान तर सारं भोवतालींच आहे. मात्र एका अटीवर. मी येईन तेव्हां लच्छीनं आधी नाचलं पाहीजे. ती जेव्हां नाचायची थांबेल तेव्हांपासून मीही येणार नाहीं. अट साधी होती. लच्छी कबूल झाली. म्हातारीचं काम झालं. पण नाचायचं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. हुकमी नाचायचं, तर मनही तसंच हवं. लच्छी तेव्हांपासून आनंदीच राहूं लागली. मोर कधीं, केव्हां येईल याचा नेम नसे. पुढं पुढं मोर येऊन गेला कीं काय याचाही तिला भान राहत नसे..."

पुढे लेखक म्हणतात - "मोर हवा तर आपणच मोर व्हायच. जें जें हवं तें तें आपणच व्हायचं."

------

या ओळी डोक्यात घुमू लागल्या आहेत "...जें जें हवं तें तें आपणच व्हायचं...". कल्पनांच किती छान आहे. ह्याचा अर्थ असा तर नसेल ना - जे जे हवं ते आपल्यातच आहे. आत डोकावून बघायची गरज आहे.

Feb 25, 2007

काव्य-कलिका

फुलांचा गंध घेतला वाऱ्यानं
वातावरणानं
पानांना ते जमलं नाही
जन्मदात्री वेलीलासुद्धा
असं का?

- इलाही जमादार - वाटसरू

---

याला पान-वेलीचा निःसंगपणा म्हणावा का पिकतं तिथं विकत नाही?

वसंताची चाहुल

नकळत पाहिले मी
जरा खिडकीबाहेर
एका आंब्याच्या फ़ांदीला
दिसे आलेला मोहर

दिसताच झाले कशी
रोमांचित अंगभर
जणु भेटला साजण
दिर्घ विरहानंतर

-- ‌ऋतुचित्र : शिरीष पै (वसंतातील कविता/१३)

-----------------

मित्रांनो वसंत येत आहे. रंगांची उधळण. पक्षांचे कुजन. नवचैतन्याची बहार.

मी तर आतुर झालो आहे हे सगळे अनुभवायला. तुमचे काय?

Feb 24, 2007

बरेच काही उगवून आलेले

तुझ्या इच्छेप्रमाणेच
वणवण केल्यानंतर
जरा मागे वळून पाहिले तर
या क्षुद्र जंतूच्या हळव्या पायांना
यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून
बरेच काही उगवून आलेले...

Feb 7, 2007

द. भा. धामणस्कर

मी नुकत्याच द. भा. धामणस्करांच्या कविता वाचल्या. पूर्णपणे भारावुन गेलो. अलौकिक उपमा आणि सरळ सोपी शद्ब-रचना ही मला जाणवलेली वैशिष्टे. त्यांची एक कविता इथे देत आहे.

परिपक्व झाडे
------------------

रात्री सुचलेली गाणी झाडांना
सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून
पाखरांनी एकच धरलंय:
झाडांना जाग येण्यापूर्वीच
आकाशवाटांनी निघून जायचं आणि
दिवस मिटल्यानंतरही झाडांत
लवकर परतायचं नाही ...

मुकी झाडे अनाग्रहीपणे
पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;

गाणे आपल्याच कंठात उद्‌भवते हा गैरसमज
त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे
वाट पाहावयास तयार आहेत...

May 7, 2006

जोडसाखळी - एक साहित्य खेळ

१.सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक -

माणुस - अनिल अवचट

२.वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती -

वाचतो आहे.

३.अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी ५ पुस्तके -

काजळमाया - जी. ए. कुलकर्णी
सांजशकुन - जी. ए. कुलकर्णी
पैस - दुर्गा भागवत
हंस अकेला - मेघना पेठे
आंधळ्याच्या गाई - मेघना पेठे

४.अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके -

तुंबाडचे खोत - श्री. ना. पेंडसे
जास्वंद - माधव आचवल
संभाजी - विश्वास पाटिल
मुंबईचे फुलपाखरू - रविंद्र पिंगे
* - गो.नी.दा.
* - सुरेश भट
* - मंगेश पाडगावकर
(आता हि यादि वाढवायचा मोह मी आवरतो.)

५.एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे -

मला मेघना पेठे यांचे 'आंधळ्याच्या गाई' आणि 'हंस अकेला' हि पुस्तकं फार आवडतात. मराठी साहित्य विश्वात स्त्री-पुरूष नातेसंबंधाबद्दल एवढ्या वास्तववादी स्तरावर लेखन प्रथमच घडले असावे. मुळातच नाजुक विषय. त्यात अत्यंत प्रभावी, निर्भिड लेखन शैली. आणि त्याला वास्तवाची धार. यामुळे हे पुस्तक मनावर खोलवर परिणाम साधते. सगळ्यांनी जरूर वाचावे असे पुस्तक.


मी हा खेळ चालु ठेवण्यासाठी खालील ब्लॉगर्सची नावे सुचवतो -

सुमेधा - आपुला संवाद आपणासी...
विनी - मन का मनका फेर
अकिरा - स्पंदन

हा खेळ येथुन सुरू झाला - पुस्तकनिष्ठांची मांदियाळी

May 4, 2006

दुर्गा भागवतांचे लेखन

दुर्गा भागवत ह्यांनी त्यांच्या 'पैस' ह्या पुस्तकामधे दुःखावर खालील विचार व्यक्त केले आहेत. वाचुन धन्य झालो. दुःखाकडे बघायचा काय पर्स्पेक्टीव्ह आहे. कितीही वेळा वाचले तरी मन भरत नाही. 'पैस' हे फार थोर पुस्तक आहे. जरूर वाचा.


"...आलेल्या सुखाकडे, प्रेमाच्या पूर्तीकडे, जन्मोजन्मीच्या मोहाकडे विठोबा पाठ फिरवतो तो देवमाणुस म्हणून. देवमाणूस म्हणूनच तो चिरंतन दुःखाचे आवाहन करतो. ते आटू देत नाही. सुखाच्या वरदानाहून, कर्तव्याचा व सत्याच रंग असलेले दुःख अधिक सुफळ असते..."

-- पंढरीचा विठोबा : पैस : दुर्गा भागवत


"...मी माझ्या भक्तांना सुख देत नाही. दुःख देतो. दारिद्र्य देतो. मुद्दामच करतो मी ते. पराभक्तीचे सुख मानवमात्राला मिळावे, मला भक्ताशी एकरूप होण्याचे भाग्य मिळावे, म्हणून मी तसे करतो. तिळभर आशा जरी माझ्या भक्ताला राहिली तरी मी ती मोडतो. त्याला निराश करणे मला आवडते. कारण, निराशेची शीग गाठल्याशिवाय, ऐहिक वासना मेल्याशिवाय परमसुखाचा कोंबही कुठे रुजत नाही. ऐहिक सुख हा मी आणि माझे भक्त यांच्यामधला अंतराय आहे; तो मी दूर करतो. माझ्या भक्तांना निर्वाणीच्या घडीला, आर्त झाल्यावर, माझ्याशिवाय अन्य सहारा राहू नये म्हणून मी फार जागरूक असतो. म्हणूनच दुःखांची पेरणी करून मी त्याला दुखवतो नि टोचून, तापवून माझ्याकडे वळवतो. एकदा माझ्याकडे आल्यावर नि माझ्याशी तद्रूप झाल्यावर ही दुःखे, ही दैन्ये, हे क्लेश मिटतात. कायमचे मिटतात. तिथून सुख फुटते..."

-- व्दारकेचा राणा : पैस : दुर्गा भागवत

लंपट ओले वस्त्र हो‍उनी

लंपट ओले वस्त्र हो‍उनी
अंग अंग तव लिंपुन घ्यावे

हुळहुळनारे वस्त्र रेशमी
हो‍उनी वर वर घोटाळावे.

भुइवर निखळुन नवख्यापरि तुज
दुरून रात्री तसे पाहावे

पहाट होता पश्मीन्याची
शाल हो‍उनी तुज छपवावे.

- पु. शि. रेगे

त्रिवेणी - १

'त्रिवेणी' हा गुलजार ह्यांचा काव्यरचनेचा एक विशेष प्रकार आहे. ह्या मधे प्रत्येक कविता तीन ओळींची असते. पहिल्या दोन ओळी काव्यपुर्ती करतात आणि तिसरी ओळ त्या काव्याला वास्तवतेची जोड देते. वरकरणी हा रचनाप्रकार साधा दिसत असला तरीही कमी शब्दात आशय व्यक्त करण्याचे सामर्थ्य त्यात आहे.

उडून जाताना पाखराने फक्त इतकेच पाहीले
किती तरी वेळ फांदी हात हालवत होती

निरोप घेण्यासाठी? की पुन्हा बोलावण्यासाठी?

---

काय ठाउक कुठून घाव घालील अचानक
मी तर या आयुष्यालाच घाबरतो फक्त!

मरणाचे काय? ते एकदाच मारून टाकते!

---

आजचा पेपर इतका भिजलेला कसा?
उद्यापासून हा पेपरवाला बदलून टाका

'या वर्षी पाचशे गावे पुरात वाहून गेली!'

---

रोज उठून टांगायचा चंद्र रात्री आभाळात
रोज दिवसाच्या उजेडात रात्र होईतो वाट बघायची

हातभर अंतर पार करण्यासाठी आयुष्यभर चालावे लागते!

---

एखाद्या घासासारखी झोप गिळून टाकते मला
रेशमी पायमोजे पायातून अलगद निघावेत तशी...

आणि सकाळी वाटते, थडग्यातून बाहेर पडतो आहे मी!

---