पु. शि. रेगे यांच्या सावित्री या पुस्तकात सांगितलेली प्रतिकात्मक गोष्ट इथे देत आहे -
"...एक म्हातारी आणि तिची छोटी नात - लच्छी - गांवाबाहेर दूर रानापाशीं राहत होतीं. एकदां म्हातारीच्या झोपडीपाशीं एक मोर आला. मोराला पाहून लच्छी नाचूं लागली. मोरही नाचूं लागला. लच्छीने हट्ट घेतला कीं मोराला अंगणांतच बांधून ठेवावं. म्हातारी म्हणाली, तें कसं होणार? आपल्यापाशीं त्याला खायला द्यायला दाणागोटा कुठं आहे? दोघींचा निर्णय होईना. तेव्हां मोरच म्हणाला, मी इथंच जवळपास राहीन. मला दाणागोटा कांही नको. रान तर सारं भोवतालींच आहे. मात्र एका अटीवर. मी येईन तेव्हां लच्छीनं आधी नाचलं पाहीजे. ती जेव्हां नाचायची थांबेल तेव्हांपासून मीही येणार नाहीं. अट साधी होती. लच्छी कबूल झाली. म्हातारीचं काम झालं. पण नाचायचं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. हुकमी नाचायचं, तर मनही तसंच हवं. लच्छी तेव्हांपासून आनंदीच राहूं लागली. मोर कधीं, केव्हां येईल याचा नेम नसे. पुढं पुढं मोर येऊन गेला कीं काय याचाही तिला भान राहत नसे..."
पुढे लेखक म्हणतात - "मोर हवा तर आपणच मोर व्हायच. जें जें हवं तें तें आपणच व्हायचं."
------
या ओळी डोक्यात घुमू लागल्या आहेत "...जें जें हवं तें तें आपणच व्हायचं...". कल्पनांच किती छान आहे. ह्याचा अर्थ असा तर नसेल ना - जे जे हवं ते आपल्यातच आहे. आत डोकावून बघायची गरज आहे.