रसधारा...

काव्यपंक्ती । सुविचार । इतर ...

करविली तैसी केली कटकट ।
वांकुडे कां नीट, देव जाणे ॥
- तुकाराम

May 4, 2006

दुर्गा भागवतांचे लेखन

दुर्गा भागवत ह्यांनी त्यांच्या 'पैस' ह्या पुस्तकामधे दुःखावर खालील विचार व्यक्त केले आहेत. वाचुन धन्य झालो. दुःखाकडे बघायचा काय पर्स्पेक्टीव्ह आहे. कितीही वेळा वाचले तरी मन भरत नाही. 'पैस' हे फार थोर पुस्तक आहे. जरूर वाचा.


"...आलेल्या सुखाकडे, प्रेमाच्या पूर्तीकडे, जन्मोजन्मीच्या मोहाकडे विठोबा पाठ फिरवतो तो देवमाणुस म्हणून. देवमाणूस म्हणूनच तो चिरंतन दुःखाचे आवाहन करतो. ते आटू देत नाही. सुखाच्या वरदानाहून, कर्तव्याचा व सत्याच रंग असलेले दुःख अधिक सुफळ असते..."

-- पंढरीचा विठोबा : पैस : दुर्गा भागवत


"...मी माझ्या भक्तांना सुख देत नाही. दुःख देतो. दारिद्र्य देतो. मुद्दामच करतो मी ते. पराभक्तीचे सुख मानवमात्राला मिळावे, मला भक्ताशी एकरूप होण्याचे भाग्य मिळावे, म्हणून मी तसे करतो. तिळभर आशा जरी माझ्या भक्ताला राहिली तरी मी ती मोडतो. त्याला निराश करणे मला आवडते. कारण, निराशेची शीग गाठल्याशिवाय, ऐहिक वासना मेल्याशिवाय परमसुखाचा कोंबही कुठे रुजत नाही. ऐहिक सुख हा मी आणि माझे भक्त यांच्यामधला अंतराय आहे; तो मी दूर करतो. माझ्या भक्तांना निर्वाणीच्या घडीला, आर्त झाल्यावर, माझ्याशिवाय अन्य सहारा राहू नये म्हणून मी फार जागरूक असतो. म्हणूनच दुःखांची पेरणी करून मी त्याला दुखवतो नि टोचून, तापवून माझ्याकडे वळवतो. एकदा माझ्याकडे आल्यावर नि माझ्याशी तद्रूप झाल्यावर ही दुःखे, ही दैन्ये, हे क्लेश मिटतात. कायमचे मिटतात. तिथून सुख फुटते..."

-- व्दारकेचा राणा : पैस : दुर्गा भागवत

No comments: