रसधारा...

काव्यपंक्ती । सुविचार । इतर ...

करविली तैसी केली कटकट ।
वांकुडे कां नीट, देव जाणे ॥
- तुकाराम

May 4, 2006

त्रिवेणी - १

'त्रिवेणी' हा गुलजार ह्यांचा काव्यरचनेचा एक विशेष प्रकार आहे. ह्या मधे प्रत्येक कविता तीन ओळींची असते. पहिल्या दोन ओळी काव्यपुर्ती करतात आणि तिसरी ओळ त्या काव्याला वास्तवतेची जोड देते. वरकरणी हा रचनाप्रकार साधा दिसत असला तरीही कमी शब्दात आशय व्यक्त करण्याचे सामर्थ्य त्यात आहे.

उडून जाताना पाखराने फक्त इतकेच पाहीले
किती तरी वेळ फांदी हात हालवत होती

निरोप घेण्यासाठी? की पुन्हा बोलावण्यासाठी?

---

काय ठाउक कुठून घाव घालील अचानक
मी तर या आयुष्यालाच घाबरतो फक्त!

मरणाचे काय? ते एकदाच मारून टाकते!

---

आजचा पेपर इतका भिजलेला कसा?
उद्यापासून हा पेपरवाला बदलून टाका

'या वर्षी पाचशे गावे पुरात वाहून गेली!'

---

रोज उठून टांगायचा चंद्र रात्री आभाळात
रोज दिवसाच्या उजेडात रात्र होईतो वाट बघायची

हातभर अंतर पार करण्यासाठी आयुष्यभर चालावे लागते!

---

एखाद्या घासासारखी झोप गिळून टाकते मला
रेशमी पायमोजे पायातून अलगद निघावेत तशी...

आणि सकाळी वाटते, थडग्यातून बाहेर पडतो आहे मी!

---

2 comments:

Anonymous said...

Exlent !
vastavala padalele swapna !
-.....................
shripad
9881099187

Anonymous said...

atisundar
gulzar the great
.................
nitin naigavkar
9372475861